Sanju Samson: वर्ल्ड कप हिरो संजूला ड्रॉप नाही केलंय पण… बीसीसीआयनं अखेर मौन सोडलं; भलतंच कारण दिलं
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे, आता या संघात संजू सॅमसनला स्थान मिळालेले नाही. यावर बीसीसीआयने संजूच्या भविष्याबद्दल एक विधान केले आहे,

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेतून वैभव सूर्यवंशीने पदार्पण केले. वैभवचे पदार्पण व्हाने अशी सगळ्यांची इच्छा होती पण जसे वैबवचे पदार्पण झाले तसं संजू सॅमसनचा टीम इंडियातून पत्ता कट झाला. संजूला संघातून वगळल्यामुळे ही सर्वजण नाराज झाले. यानंतर आता झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात संजू सॅमसनचा समावेश न झाल्याने, त्याला संघातून वगळण्यात आले आहे का, याबद्दलच्या चर्चांना जोर चढला होता. आता संजूच्या भविष्याबद्दल बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे.
सोमवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. प्रभसिमरन सिंग, अभिषेक शर्मा आणि 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी यांचा सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आला, परंतु संजू सॅमसनच्या नावाचा समावेश नव्हता. यामुळे निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अंतिम 11 खेळाडूंमध्ये संजू सॅमसनचा समावेश होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे, त्याला संघासोबत पाठवण्याऐवजी, त्याला विश्रांती देऊन तरुण खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सूत्रांनी सांगितले, “झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजूला विश्रांती दिल्याबद्दल इतके आश्चर्य का व्यक्त केले जात आहे? या निर्णयावर प्रश्न विचारणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संजू भारतीय संघाचा भाग आहे. जेव्हा तो झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळणारच नव्हता, तेव्हा त्याला संघात घेण्याचा काहीच अर्थ नव्हता. तो एक वरिष्ठ खेळाडू आहे.”
संजू सॅमसनला संघातून वगळल्याबद्दलची चर्चा अधिकच तीव्र झाली, कारण अलीकडील सामन्यांमधील त्याची कामगिरी अपेक्षेनुसार नव्हती. आयर्लंड दौऱ्यावर त्याने 0 आणि 5 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात तो केवळ 1 धावेवर बाद झाला. सलग तीन खराब खेळींनंतर, दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी देण्यात आली.
मात्र, त्याच्या अलीकडील खराब फॉर्मपूर्वी, संजू सॅमसनने 2026 च्या टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. बाद फेरीच्या सामन्यांमध्ये 97, 89 आणि नाबाद 89 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळी करून त्याने भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. या कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरविण्यात आले होते. त्यानंतर संजूने आयपीएल 2026 मध्ये 14 सामन्यांत 477 धावा केल्या. मात्र, आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत राहिली.
