10 फेब्रुवारीपासून सुरु होणार Ranji Trophy, स्पर्धेचं शेड्यूल आणि वेळापत्रक झालं जाहीर
कोरोनामुळे (Corona) पुढे ढकलण्यात आलेले रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेचा नवा सीजन लवकरच सुरु होणार आहे.
मुंबई: कोरोनामुळे (Corona) पुढे ढकलण्यात आलेले रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेचा नवा सीजन लवकरच सुरु होणार आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून रणजीचा मोसम सुरु होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) सर्व राज्य क्रिकेट संघांना याची माहिती दिली आहे. आयपीएलच्या आधी आणि नंतर अशा दोन टप्प्यांमध्ये रणजी स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. पहिल्या टप्प्यात ग्रुप स्टेजचे सामने खेळले जातील. 30 मे पासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात नॉकआऊटचे सामने होतील. बोर्डाने राज्यांना स्पर्धेचा फॉर्मेट आणि स्थळांबाबतही माहिती दिली आहे. रणजी करंडक स्पर्धा यावर्षी 13 जानेवारीला सुरु होणार होती. पण कोरोना व्हायरसच्या लाटेमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.
2021 मध्ये कोरोना व्हायरसमुळे रणजी करंडक स्पर्धा होऊ शकली नव्हती. स्पर्धेच्या 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी स्पर्धा आयोजित झाली नव्हती. यावर्षी सुद्धा कोरोनामुळे रणजी स्पर्धेबद्दल साशंकता होती. पण बोर्डाने आता दोन टप्प्प्यांमध्ये रणजी स्पर्धा होणार असल्याची घोषणा केली आहे. रणजीमधून देशाला अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू मिळाले आहेत. रणजी स्पर्धा हा भारतीय क्रिकेटचा पाया आहे. त्यामुळे ही स्पर्धा महत्त्वाची आहे. टीम इंडियामध्ये निवडीच्यावेळी रणजीमधली खेळाडूची कामगिरी लक्षात घेतली जाते.
बीसीसीआयने राज्यांना जे शड्युल सांगितलय, त्यानुसार पहिल्या स्टेजची सुरुवात 10 फेब्रुवारीला होणार असून 15 मार्चपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. पहिल्या स्टेजमध्ये ग्रुप राऊंडचे सामने होणार आहेत. यात 34 दिवसात 57 सामने होतील. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलचा 15 वा सीजन सुरु होणार आहे. मे पर्यंत हा सीजन चालेल. त्यानंतर दुसरा टप्पा होईल. 30 मे ते 26 जून पर्यंत क्वार्टर फायनलचे सामने होतील. 62 दिवसात एकूण 64 सामने होणार आहेत.