IND vs ENG : थोड्यासाठी हुकलं, टीम इंडियाचा अवघ्या 5 धावांनी पराभव, ऋचा घोषची खेळी व्यर्थ
India Women vs England Women Warm Up Match Result : ऋचा घोष हीने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं. मात्र ऋचा आऊट होताच इंग्लंडच्या बाजूने सामना झुकला. शेवटच्या 3 चेंडूत सामना फिरला.

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी टीम इंडियाने वेस्ट इंडिजला सराव सामन्यात पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाकडे मुख्य स्पर्धेआधी सलग दुसरा सराव सामना जिंकण्याची संधी होती. मात्र भारतीय संघाची ही संधी अवघ्या 5 धावांनी हुकली. टीम इंडियासमोर दुसऱ्या सराव सामन्यात इंग्लंडचं आव्हान होतं. उभयसंघातील या सराव सामन्यांचं आयोजन हे कार्डीयामधील सोफीया गार्डन्समध्ये करण्यात आलं होतं. टीम इंडियाने या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना जोरदार लढत दिली. मात्र टीम इंडियाचा शेवटच्या ओव्हरमध्ये पराभव झाला. विकेटकीपर फलंदाज ऋचा घोष हीने अखेरच्या क्षणी झुंजार खेळी करुन भारताला विजयी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऋचा या प्रयत्नात अपयशी ठरली.
इंग्लंडची बॅटिंग, पहिल्या डावात काय झालं?
टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने फिल्डिंगचा निर्णय घेत इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. इंग्लंडसाठी दोघींनी अर्धशतकी खेळी केली. तर इतरांनीही योगदान दिलं. इंग्लंडसाठी ओपनर एमी जोन्स हीने सर्वाधिक केल्या. एमीने सर्वाधिक 64 धावा केल्या. तर कॅप्टन नेट सायव्हर ब्रँट हीने 57 रन्स केल्या. तर डॅनी गिबन्स हीने नाबाद 30 धावांचं योगदान दिलं. तर भारतासाठी श्रेयांका पाटील हीने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर शफाली वर्मा, रेणुका सिंग, राधा यादव आणि श्री चरणी या चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात
टीम इंडियाची 172 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात राहिली. स्मृती मंधाना 1 धाव करुन आऊट झाली. शफाली वर्मा हीने 13 धावांचं योगदान दिलं. यास्तिका भाटीया हीने निराशा केली. यास्तिकाने 15 धावा केल्या.
कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि भारती फुलमाळी या दोघींना चांगली सुरुवात मिळाली. मात्र या दोघी भारताला विजयी करण्यासाठी आवश्यक खेळी करण्यात अपयशी ठरल्या. हरमनप्रीतने 17 आणि भारतीने 18 धावांचं योगदान दिलं.
इंग्लंडने भारताला ठराविक अंतराने झटके दिले. मात्र त्यानंतर ऋचा घोष हीने धमाका केला. ऋचाने अवघ्या 36 बॉलमध्ये 68 रन्सची तुफानी खेळी केली. ऋचाने या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. ऋचाच्या या खेळीमुळे भारताच्या विजयाची आशा वाढली होती. भारताला शेवटच्या 3 बॉलमध्ये फक्त 6 धावांची गरज होती. मात्र तेव्हाच ऋचा आऊट झाली. ऋचा आऊट होताच भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. भारताने हा सामना 5 धावांनी गमावला. इंग्लंडने भारताला 19.5 ओव्हरमध्ये 166 रन्सवर ऑलआऊट केलं.
