IND vs NZ Final : राखीव दिवशीही सामना न झाल्यास न्यूझीलंड वर्ल्ड कप विजेता? जाणून घ्या नियम
India vs New Zealand Final Reserve Day : टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियासमोर अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान आहे. मात्र हा महाअंतिम सामना राखीव दिवशीही न झाल्यास विजेता कोण ठरणार? जाणून घ्या.

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी 5 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये इंग्लंडवर उपांत्य फेरीतील सामन्यात सनसनाटी विजय मिळवला. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात या सामन्यात इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करत सलग दुसऱ्यांदा सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. आता टीम इंडिया अंतिम फेरीत किवी अर्थात न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. हा सामना रविवारी 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप गतविजेता आहे. त्यामुळे टीम इंडिया ट्रॉफी राखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत सेमी फायनल आणि फायनल सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद केलेली असते. निर्णायक सामन्याचा निकाल लागावा या हेतूने राखीव दिवसाची तरतूद केली जाते. त्यानुसार आयसीसीकडून ही विशेष तरतूद असते. अशात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसाने विघ्न घातल्यास काय होणार? तसेच राखीव दिवसाचा नियम काय असणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
राखीव दिवस आणि अंतिम सामना
उभयसंघातील अंतिम सामना हा रविवारी 8 मार्चला मुख्य दिवशी होणार आहे. मुख्य दिवशी सामना न झाल्यास सोमवारी 9 मार्चला राखीव दिवशी खेळ होईल. महत्त्वाची बाब म्हणजे 9 तारखेला खेळाची सुरुवात तिथूनच होईल जिथे 8 मार्चला खेळ थांबवण्यात आला होता.
किमान 10 ओव्हरचा खेळ बंधनकारक
द्विपक्षीय मालिकेत सामन्याचा निकाल लागण्यासाठी डीएलएसनुसार किमान 5 षटकांचा खेळ होणं बंधनकारक असतं. दोन्ही संघांनी 5 ओव्हर खेळल्यास डीएलएसनुसार विजेता ठरवता येतो. मात्र हा अंतिम सामना आहे. आयसीसीच्या नियमानुसार, या सामन्याचा निकाला लावण्यासाठी किमान 10 षटकांचा खेळ होणं गरजेचं आहे.
राखीव दिवशीही विशेष वेळेची तरतूद
नियोजित वेळेनुसार मुख्य दिवशी सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणं अपेक्षित आहे. मात्र पाऊस किंवा इतर कारणांमुळे आयसीसीने पूर्ण 20 षटकांचा खेळ व्हावा यासाठी अंतिम सामन्यासाठी 90 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला आहे. तर राखीव दिवशी ही मुदत 120 मिनिटं अर्थात 2 तासांची आहे.
तसेच शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राखीव दिवशीही अंतिम सामना न झाल्यास भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात येईल.
