IND vs SL 2nd Test: कोलंबोत नाणेफेकीचा कौल गमावला तरी नो टेन्शन! कारण वाचून तुम्हीही व्हाल आवाक्
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कोलंबोच्या एसीसी ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असेल, असं क्रीडाप्रेमींना वाटत आहे. पण या मैदानातील आकडेवारी काही वेगळीच सांगत आहे. त्यामुळे नाणेफेक गमावली तरी टेन्शन घेण्याचं कारण नाही.

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना गॉलमध्ये रंगला आणि भारताने 165 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल किती महत्त्वाचा होता? हे कर्णधारांनी सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतरही सांगितलं. कारण गॉलमध्ये प्रथम फलंदाजी घेणंच फायद्याचं ठरतं. शुबमन गिलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी घेतली होती. त्यामुळे निकाल काय लागला हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असेल, अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. 23 ऑगस्टला कोलंबोच्या ऐतिहासिक सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानात हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सामन्याला सुरूवात होईल, पण नाणेफेकीचा कौल हा 9.30 वाजता होईल. पण दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीवेळी फार काही चिंता करण्याचं कारण नाही. कारण या मैदानात नाणेफेकीचा कौल गमावला तरी निकाल मात्र वेगळा लागतो, असं आकडेवारी सांगते.
एसीसी ग्राउंडवर नाणेफेक गमावणारा संघ ठरतो भारी
कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकलेला संघ सामन्यावर पकड मिळवतो. कारण चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टीची स्थिती काय? यावर सगळं ठरतं. पण एसीसी ग्राउंडमधील नाणेफेकीचा इतिहास काही वेगळा आहे. कारण या मैदानात नाणेफेक कोणीही जिंकली, तरी चांगली कामगिरी कोणी केली? यावर सर्व ठरतं. या मैदानात आतापर्यंत 46 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यात 15 सामने नाणेफेक जिंकणारा संघ, 17 सामने नाणेफेक गमावणारा संघ जिंकला आहे. त्यात 14 सामने ड्रॉ झाले आहेत. त्यामुळे नाणेफेक गमावणाऱ्या संघ आकडेवारीवरून वरचढ दिसत आहे. या मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी किंवा फलंदाजी घेतल्याने काही फरक पडत नाही. कारण 32 सामन्यांचा निकाल 50-50 लागला आहे. यात 16 सामने प्रथम फलंदाजी करणारा संघ, तर 16 सामने प्रथम गोलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.
2008 पासून भारताची या मैदानात विजयी आघाडी
कोलंबोचं मैदान टीम इंडियाला खूप भावतं असं आकडेवारीवरून दिसून येतं. भारताने या मैदानात आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहे. त्यापैकी भारताने 3 सामन्यात विजय, श्रीलंकेने 2 सामन्यात विजय, तर 4 सामने ड्रॉ झाले आहेत. इतकंच काय तर 2008 पासून या मैदानात श्रीलंकेला भारताविरुद्ध एकही विजय मिळालेला नाही. त्यामुळे दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला 2-0ने मात देण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. जर तसं झालं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आशा जिवंत राहतील.
