IND vs SA: भारत ऐतिहासिक विजयापासून सहा विकेट दूर, उद्या सेंच्युरियनमध्ये काय घडणार?
सेंच्युरियनच्या या पीचवर 305 धावांचे लक्ष्य इतके सोपे नाहीय. आतापर्यंतचा सेंच्युरियनचा इतिहास पाहिला तर कुठलाही संघ चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावा करु शकलेला नाही.
जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिला कसोटी सामना रंगतदार वळणावर आला आहे. उद्या सेंच्युरियनमध्ये इतिहास रचण्यापासून भारतीय संघ फक्त सहा विकेट दूर आहे. चौथ्यादिवशी भारताचा डाव 174 धावात आटोपला. पहिल्या डावातील आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य दिले आहे. आज दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या चार बाद 94 धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही 211 धावांनी पिछाडीवर आहे. (India vs south Africa will india create history on centurion)
कर्णधार डीन एल्गर अजूनही मैदानावर आहे आणि तीच भारतासाठी मुख्य अडचण आहे. त्याने दिवसाच्या अखेरच्या सत्रात शानदार अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेने मार्करम, कीगन पीटरसन आणि सारी वॅन डर यांच्या विकेट गमावल्या आहेत. दिवसातील शेवटच्या चेंडूवर बुमराहने केशव महाराजला बाद करुन भारताला मोठा दिलासा दिला. दुसऱ्या डावात आतापर्यंत जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या असून शामी आणि सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतला आहे. उद्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला तर सेंच्युरियनवरील तो भारताचा पहिला विजय ठरेल. याआधी भारताने दोन्ही सामने गमावले आहेत.
सेंच्युरियनच्या या पीचवर 305 धावांचे लक्ष्य इतके सोपे नाहीय. आतापर्यंतचा सेंच्युरियनचा इतिहास पाहिला तर कुठलाही संघ चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावा करु शकलेला नाही. सेंच्युरियनच्या या विकेटवर गोलंदाज धाक ठेवतील अशी स्थिती आहे. कारण चेंडूला मध्येच उसळी मिळतेय, तर कधी चेंडू खाली राहतोय.
दुसऱ्यात डावात भारतीय फलंदाजांनी केली निराशा
पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली. कागिसो राबाडा, लुंगी निगीडी आणि मार्को जॅनसेन या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा डाव 174 धावात आटोपला. पहिल्या डावातील 130 धावांच्या आघाडीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरु शकला नाही.
चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे या मधल्या फळीतीली फलंदाजांनी निराश केले. भारताकडून कुणीही अर्धशतकी खेळी केली नाही. ऋषभ पंतने सर्वाधिक (34) धावा केल्या. मागच्या डावातील शतकवीर केएल राहुल आज (23) धावांवर बाद झाला. विराट कोहली (18), चेतेश्वर पुजारा (16) आणि अजिंक्य रहाणे (20) धावांवर बाद झाले. राबाडा, जॅनसेनने प्रत्येकी चार तर निगीडीने दोन विकेट घेतल्या.
संबंधित बातम्या:
IND VS SA: विराटाच्या शॉट सिलेक्शनवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले…. Virat Kohli : एकच चूक वारंवार करून Out होतोय विराट कोहली, सोशल मीडियावर Troll Ranji Trophy: मुंबईच्या रणजी संघात अर्जुन तेंडुलकर, पृथ्वी शॉ कर्णधार
(India vs south Africa will india create history on centurion)