IPL 2026: आठव्या क्रमांकावर असलेल्या केकेआरला प्लेऑफची संधी, चौथ्या स्थानावर असा मिळेल ताबा
आयपीएल 2026 स्पर्धेची प्लेऑफची रंगत आता एका जागेसाठी शिल्लक राहिली आहे. पाच संघ या जागेसाठी दावेदार आहेत. गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर असलेल्या केकेआरलाही प्लेऑफची संधी आहे. कसं समीकरण जुळणं आवश्यक आहे ते जाणून घ्या.

आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. आयपीएल स्पर्धेच्या 63व्या सामन्यानंतर तीन संघांनी अधिकृतरित्या प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे यांच्यात एका जागेसाठी चुरस आहे. तर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे पाच संघांमध्ये एका जागेसाठी लढत असणार आहे. गुणतालिकेत केकेआरचा संघ आठव्या स्थानावर आहे. पण समीकरण जुळून आलं तर प्लेऑफमधील जागा पक्की होईल. त्यामुळे केकेआर संघ चमत्कार करणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
केकेआरला अशी मिळणार प्लेऑफची संधी
कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएल स्पर्धेतील सुरूवात निराशाजनक झाली. सुरूवातीला मिळालेल्या पाच पराभवामुळे गणित चुकलं असंच वाटलं होतं. त्यात एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने एक गुण मिळाला. पण त्यानंतर केकेआरने कमबॅक केलं आणि चार सामने सलग जिंकले. त्यानंतर एक सामना गमावला. पण मागच्या सामन्यात पुन्हा एकदा विजय मिळवला. केकेआरने आतापर्यंत 12 सामने खेळले. त्यात पाच सामन्यात विजय, सहा सामन्यात पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे 11 गुण आणि -0.038 नेट रनरेटसह आठव्या स्थानावर आहे. पण तरीही प्लेऑफची संधी आहे. यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्यामुळे 15 गुण होतील आणि इतर चार संघांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावं लागेल.
केकेआरचं समीकरण समजून घ्या
- केकेआरचे शेवटचे दोन सामने मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहेत. हे दोन्ही सामने जिंकणं केकेआरला भाग आहे. एक सामना गमावला तरी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. दोन सामने जिंकले तर 15 गुण होतील.
- केकेआरचा शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी आहे. दिल्ली कॅपिटल्सचे 12 गुण असून जर तरच्या आशेवर आहे. या सामन्यात केकेआरने बाजी मारली तर वाटेतून दिल्ली कॅपिटल्सचा पत्ता कट होईल.
- पंजाब किंग्सने 13 सामन्यात 13 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे शेवटचा सामना जिंकला तर 15 गुण होतील. त्यामुळे हा सामना पंजाबने गमावला तर केकेआरसाठी संधी असेल. पंजाब किंग्सचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आहे. पण जिंकला तर केकेआरला नेट रनरेट चांगला करावा लागेल.
- राजस्थान रॉयल्सने 12 सामन्यात 6 विजयासाह 12 गुण मिळवले आहेत. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर 16 गुण होतील. पण एक सामना गमावला तर केकेआरला संधी मिळेल. राजस्थानचा शेवटचे दोन सामन लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सशी होणार आहेत.
- चेन्नई सुपर किंग्सने 13 सामन्यात 6 विजयांसह 12 गुण कमावले आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात विजय मिळवला तर आशा जिवंत राहतील. पण केकेआरने दोन्ही सामने जिंकले तर त्यांच्या पुढे निघून जाईल. त्यामुळे चेन्नईने सामना जिंकला काय आणि हरला काय तरी फरक पडणार नाही.
