IPL 2026, SRH vs LSG: ऋषभ पंतची विजयी अर्धशतकी खेळी, सामना संपल्यानंतर सरळ म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. सनरायझर्स हैदराबादला 5 गडी राखून पराभूत केलं. या विजयात कर्णधार ऋषभ पंतची खेळी महत्त्वाची ठरली. या सामन्यानंतर ऋषभ पंतने आपलं मनोगत व्यक्त केलं.

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघाने पहिल्या विजयाची नोंद केली. लखनौ सुपर जायंट्स या स्पर्धेतील दुसरा सामना खेळली. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झाले. पण दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजी निवडली. तसेच सनरायझर्स हैदराबादला 156 धावांवर रोखलं. विजयासाठी दिलेल्या 157 धावांचं आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 19.5 षटकात पूर्ण केलं. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सात सामन्यांमधील लखनौ सुपर जायंट्सचा हा पाचवा विजय आहे. यात चार सामन्यांपैकी हैदराबादमध्ये तीन विजय मिळवले आहेत. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना शानदार अर्धशतक झळकावले. या सामन्यात सलामी ऐवजी पंत तिसऱ्या क्रमांकावर आला. त्याने 43 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात लखनौला विजयासाठी 9 धावांची गरज होती. तेव्हा ऋषभ पंतने जयदेव उनाडकटच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारून लखनौचा विजय सोपा. तसेच पाचव्या चेंडूवर आणखी एक चौकार मारला आणि विजय मिळवला.
काय म्हणाला ऋषभ पंत?
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘मला वाटतं की गोलंदाजांचं कौतुक करायलाच हवं, कारण तेच लोक तुम्हाला सामन्यासाठी तयार करतात, विशेषतः जेव्हा तुम्ही प्रथम गोलंदाजी करता. मला वाटतं शमी भाई, आवेश, राठी, मला वाटतं प्रत्येकाने खूप चांगलं योगदान दिलं आहे, विशेषतः आज आलेल्या सिद्धार्थने. तुम्हाला माहिती आहे, आम्ही मैदानावर ठरवलं होतं की तो सामना जिंकून देईल आणि त्याने आमच्यासाठी खूप चांगलं काम केलं. ‘
काय म्हणाला इशान किशन?
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशन म्हणाला की, ‘ मला वाटतं की गोलंदाजांनी आज खूपच चांगलं काम केलं. त्यांनी योजनेनुसार योग्य ठिकाणी गोलंदाजी केली, तसेच क्षेत्ररक्षकांनीही पूर्ण प्रयत्न केल्याबद्दल त्यांना श्रेय द्यायला हवं. पण तुम्हाला माहिती आहे, अशा स्पर्धांमध्ये एक-दोन चौकार मारून सामना हातातून निसटू शकतो. त्यामुळे हो, पण ज्या प्रकारे आम्ही हा सामना लढलो, त्याचा मला आनंद आहे.’
