टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तान! शादाब खानला उपांत्य फेरीचं विचारताच… Video
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केलं. या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचं सुपर 8 फेरीचं गणित चुकलं. त्यामुळे आता नामिबियाविरुद्ध करो या मरोची लढाई आहे. असं असताना पाकिस्तानी खेळाडू थेट अंतिम फेरीच्या गप्पा मारायला लागले आहेत.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना एकतर्फी जिंकला. पाकिस्तानची या सामन्यात कुठेच छाप पडली नाही. उलट कर्णधार सूर्यकुमार यादवने तिलक वर्मा आणि रिंकु सिंह यांना गोलंदाजी दिली आणि आणखी लाज काढली. पाकिस्तानने हा सामना 61 धावांनी गमावला. या सामन्यात मिस्ट्री स्पिनर उस्मान तारीकची खूपच चर्चा रंगली होती. पण त्यालाही भारताविरूद्ध खास काही करता आलं नाही. पण या पराभवाचं पाकिस्तानला काहीच वाटत नाही, असं उस्मान तारीक म्हणाला. खरं तर लाज वाटावा असा पराभव होता, पण पाकिस्तानचा स्वभाव तसा आहे त्याला काय करणार? आता नामिबिया विरूद्धच्या सामन्यापूर्वी फिरकीपटू शादाब खानने अंतिम सामन्यावरच दावा ठोकला आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी शादाब खानने सांगितलं की, अंतिम फेरीपर्यंत कोलंबोत असणार आहोत. पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ म्हणजेच श्रीलंकेत होणार आहेत.
शादाब खान सराव करून परतत असताना त्याला पाकिस्तानी पत्रकाराने प्रश्न विचारला की, उपांत्य फेरीपर्यंत येथेच असाल का? तेव्हा त्याने कोलंबोत अंतिम फेरीपर्यंत असू असं सांगितलं. खरं तर पाकिस्तानची या स्पर्धेतील स्थिती नाजूक आहे. एकाच ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सराव करत असूनही काहीच उपयोग झाला नाही. नेदरलँडसारख्या दुबळ्या संघाने विजयासाठी झुंजवलं. तर भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे पाकिस्तान अंतिम फेरी गाठेल असं वाटत नाही. त्यात सुपर 8 फेरीत तगडे संघ आहेत. या संघावर मात करून उपांत्य फेरी गाठणं कठीण काम आहे. पाकिस्तानच्या स्थितीवर अंतिम फेरीचा सामना अहमदाबादला होणार की कोलंबोत होणार हे ठरणार आहे.
Shadab Khan said, “We will play the final.” pic.twitter.com/ycnA5kK7iE
— Sheri. (@CallMeSheri1_) February 17, 2026
पाकिस्तानी संघात बदल होणार?
भारताविरूद्धच्या सामन्यात पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर पाकिस्तानी संघात बदल होण्याची शक्यता वाढली आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांना ड्रॉप केलं जाऊ शकतं. बाबरच्या जागी फखर जमान आणि शाहीनच्या जागी सलमान मिर्झाला स्थान मिळू शकतं. या दोन्ही खेळाडूंनी मंगळवारी जोरदार सराव केला.
