IPL 2026 स्पर्धेदरम्यान कर्णधार बदलाची घोषणा, फ्रेंचायझीने सगळं काही सांगून टाकलं
आयपीएल 2026 स्पर्धेदरम्यान कर्णधार बदलाची घोषणा झाली आहे. त्यामुळे येत्या सामन्यात हा बदल पाहायला मिळणार आहे. पुढच्या सामन्यात हा संघ आपल्या खऱ्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेची रंगत आता वाढली आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. असं असताना या स्पर्धेदरम्यान एका संघाचा कर्णधार बदलणार असल्याचं निश्चित झालं आहे. हा संघ दुसरा तिसरा कोणी नसून सनरायझर्स हैदराबाद आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ पुढच्या सामन्यात नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. पॅट कमिन्स गैरहजेरीत इशान किशनने सात सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व केलं. आता पुढच्या सामन्यात पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा हाती घेणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात पॅट कमिन्स दुखापतीमुळे खेळू शकला नाही. पण आता फिट अँड फाईन झाला असून मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. म्हणजेच आता कर्णधारपदाचा भार इशान किशनकडून पॅट कमिन्सकडे जाणार आहे. पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत कर्णधारपद इशान किशन, तर उपकर्णधारपद अभिषेक शर्माकडे सोपवण्यात आलं होतं.
आयपीएल 2026 स्पर्धेदरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाने अधिकृतपणे घोषणा करत ही माहिती दिली आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान विरूद्धच्या सामन्यात खेळणार आहे. हा सामना 25 एप्रिलला होणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील हा पहिला रिव्हर्स फिक्स्चर असणार आहे. म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा राजस्थान रॉयल्स संघाशी भिडणार आहे. पॅट कमिन्सचे पुनरागमन हैदराबादसाठी एक मोठे प्रोत्साहन ठरेल. कारण तो संघाचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे.
Vastunnadu 🧡🔥 pic.twitter.com/9ZzYaR1fGK
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 24, 2026
पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत इशान किशनच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने एकूण सात सामने खेळले. या सात पैकी चार सामन्यात विजय, तर तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. सध्या सनरायझर्स हैदराबादच्या पारड्यात 8 गुण असून नेट रनरेट हा +0.820 आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ चौथ्या स्थानी असून प्लेऑफच्या शर्यतीत आहे. आयपीएल स्पर्धेतील 7 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल.
