IND vs ENG, Semi Final: नाणेफेकीचा कौलच ठरवणार विजेता कोण? कसं काय ते समजून घ्या
IND vs ENG SemiFinal, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कसं काय ते समजून घ्या

IND vs ENG SemiFinal, T20 World Cup 2026: टीम इंडिया जेतेपदापासून दोन विजय दूर आहे. टीम इंडियाला पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना जिंकावा लागेल. त्यानंतर अंतिम फेरीत न्यूझीलंडला धोबीपछाड द्यावा लागेल. त्यानंतर जेतेपदाची चव चाखता येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मैदानात नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. नाणेफेकीचा कौल गमावला की अर्धा सामना गमवल्यातच जमा असतो. आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या बाद फेरीत असाच ट्रेंड पाहायला मिळाला आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल गमणाऱ्या संघाला विजयासाठी खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची नजर ही नाणेफेकीकडे लागून आहे. आता टीम इंडियाला नशिबाची साथ मिळते की नाही हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
भारत दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी 2016 मध्ये भारतात टी20 वर्ल्डकप झाला होता. त्यावेळी झालेल्या प्रत्येक बाद फेरीच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवालेल्या संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. टी20 वर्ल्डकप 2016 स्पर्धेत इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथम गोलंदाजी घेतली होती. तेव्हा न्यूझीलंडला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. दुसऱ्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि भारताला 7 विकेट राखून पराभूत केलं. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडला 4 विकेटने पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं.
2016 मध्ये भारतात झालेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बाद फेरीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजयाची चव चाखायला मिळाली आहे. 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही तसंच घडलं. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि दक्षिण अफ्रिकेला 9 गडी राखून मात दिली. दरम्यान, मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारत इंग्लंड हा सामना होत आहे. या सामन्यात दुसऱ्या डावात दव फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं कठीण होतं. अशा स्थितीत नाणेफेकी जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देणार यात काही शंका नाही.
