IND vs WI : ‘भारताविरुद्धच्या सामन्यासाठी….’, वेस्ट इंडिजचा प्रशिक्षक डॅरेन सॅमीने केलं मोठं विधान
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. हा सामना करो या मरोची लढाई आहे. कारण या सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. असं असताना वेस्ट इंडिजचा प्रशिक्षक डॅरेन सॅमीने एक विधान केलं आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज या सुपर 8 फेरीतील सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारायची तर हा सामना जिंकणं भाग आहे. त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज या दोघांसाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. हा सामना 1 मार्च रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डनर मैदानावर होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्या क्रिकेटप्रेमींच्या नजरा असणार आहेत. या सामन्यात दोन्ही संघांची रणनिती काय असेल? कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार? याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा प्रशिक्षक डॅरेन सॅमी या सामन्याबाबत सकारात्मक आहे. त्याला आपल्या संघातील खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे. सुपर 8 फेरीत भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना दक्षिण अफ्रिकेने पराभूत केलं आहे. तर दोन्ही संघांनी झिम्बाब्वेला पराभूत केलं आहे. आता भारत वेस्ट इंडिज आमनेसामने येत आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार? याची चर्चा रंगली आहे.
वेस्ट इंडिजचा प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सांगितलं की, “ही स्पर्धा जिंकण्यासाठी, तुम्हाला कधीतरी भारतातून जावे लागेल. विजयी होण्यासाठी आम्ही चांगला खेळ खेळणार आहोत. तरीही ते डेव्हिड आणि गोलियाथच्या लढतीसारखे वाटेल, परंतु 2016 मध्ये डेव्हिडने गोलियाथला हरवले, म्हणून मी माझ्या मुलांना हेच सांगेन. माझे सर्व सैनिक युद्धासाठी सज्ज आहेत.” 2016 मध्ये डॅरेन सॅमी वेस्ट इंडिजचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्त्वात ईडन गार्डन्सवर आयसीसी टी20 वर्ल्डकप जिंकला होता. पण आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. 2016 उपांत्य फेरीत भारत वेस्ट इंडिज आमनेसामने आले होते. तेव्हा भारताने 20 षटकात 2 गडी गमवून 192 धावा केल्या होत्या. हे आव्हान वेस्ट इंडिजने 19.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं होतं. त्यामुळे भारताचं अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं होत.
प्रशिक्षक डॅरेन सॅमी पुढे म्हणाला की, “दक्षिण आफ्रिकेने दाखवून दिले आहे की भारताला हरवता येते, परंतु तुमच्याकडे काही अत्यंत चांगले पॉवर हिटर आहेत. वरुण टी20 क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज आहे. आम्ही प्रत्येक विरोधी संघाचा आदर करतो.”
