‘त्या एका सामन्याला इतकी प्रसिद्धी का?’ टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी स्मृती मंधानाने स्पष्टच सांगितलं की…
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आता तयारी अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेत क्रीडाप्रेमींचं लक्ष भारत पाकिस्तान सामन्याकडे लागून आहे. पण स्मृती मंधानाने या स्पर्धेसाठी एक विशेष आवाहन केलं आहे. नेमकं काय म्हणाली ते जाणून घेऊयात...

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 5 जुलैला होणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान सामन्याची उत्सुकता आतापासून लागून आहे. या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी होणार आहे. हा सामना 14 जून रोजी होणार आहे. भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. या सामन्यासाठी मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं असतं. तसे या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर रान पेटलेलं असतं. दोन्ही देशातील क्रीडाप्रेमी पोस्टचा भडिमार करून सामन्याचं वातावरण पेटवतात. इतकंच काय तर एकमेकांच्या पोस्टवर तुटून पडतात. असं असताना या सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मंधानाने प्रसारमाध्यमं आणि चाहत्यांना एक विशेष आवाहन केलं आहे.
काय म्हणाली स्मृती मंधाना?
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्मृती मंधाना म्हणाली की, बर्मिंगहॅम 2022 येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आम्ही भारत-पाकिस्तान सामना खेळलो होतो. त्या सामन्याला संपूर्ण मैदान हाऊसफुल झाले होते. तर इतर सामन्यांसाठीही तशीच क्रेझ असावी.एका सामन्यासाठी विशेष प्रसिद्धी मिळवण्याची गरज नाही, कारण त्याबद्दल आधीच पुरेशी क्रेझ आहे. मला आशा आहे की सर्व चाहते संपूर्ण स्पर्धेत आम्हाला पाठिंबा देतील. महिला टी20 क्रिकेटचा इतिहास पाहता, पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी अजिंक्य आहे. हे दोन संघ 16 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी भारतीय संघाने 13 वेळा विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला फक्त 3 सामने जिंकता आले आहेत.
साखळी फेरीत भारताचे सामने
भारताला या स्पर्धेच्या साखळी फेरीत फक्त पाकिस्तानचाच नव्हे, तर इतर बलाढ्य संघांचाही सामना करावा लागणार आहे. 14 जूनला पाकिस्तानशी सामना झाल्यानंतर नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि गतविजेता ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे. टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. तेव्हा भारताने पाकिस्तानला सहा गडी राखून पराभूत केलं होतं. यंदाही भारतीय संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
