हार्दिक पांड्याने मुंबई सोडली, करिअरसाठी उचललं मोठं पाऊल! जाणून आता कुठे जाणार?
अष्टपैलू हार्दिक पांड्याने क्रिकेट करिअरसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गुजरातच्या वडोदरातून येणाऱ्या हार्दिक पांड्या मागच्या काही वर्षांपासून मुंबईतच राहात होता. तसेच येथेच क्रिकेटचे धडे गिरवत होता. पण आता त्याने आपलं ठिकाण बदललं आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने मुंबई सोडली आहे. तसेच बंगळुरूला शिफ्ट झाला आहे. हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघ सोडला आणि आरसीबीत गेला की काय? असा प्रश्न तु्म्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. पण तसं अजिबात नाही. हार्दिक पांड्याने ना मुंबई इंडियन्स सोडली आहे, ना आरसीबी संघात रुजू होणार आहे. हार्दिक पांड्याने मुंबई शहर सोडलं असून बंगळुरूत शिफ्ट झाला आहे. एका रिपोर्टनुसार, दुखापतीने त्रस्त असलेल्या अष्टपैलू हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय करिअर पूर्ण होईपर्यंत बंगळुरूत राहण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा भारतीय संघ, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्यस्त नसेल, तेव्हा त्याचं राहण्याचं ठिकाण हे बीसीसीआयचं सेंटर ऑफ एक्सिलेंस असणार आहे. दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्याला मुकलेला हार्दिक पांड्या मागच्या काही दिवसांपासून बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये फिट होण्यासाठी काम करत आहे. आता हार्दिक या सेंटरच्या जवळपास राहणार आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याने आपल्या करिअरसाठी हा निर्णय घेतला आहे. असं करणारा हार्दिक पांड्या हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. रिपोर्टनुसार, हार्दिकने हा निर्णय CoE च्या प्रशिक्षण सुविधांचा पुरेपूर वापर करता येईल यासाठी घेतला आहे. फिटनेस, पुनर्वसन, वैद्यकीय आणि क्रिकेट सराव यांसारख्या महत्त्वाच्या सुविधांचा त्याला फायदा घेता येईल. तसेच हार्दिक पांड्याला पुढचे पाच ते सहा वर्षे टीम इंडियाकडून खेळायचं आहे. त्यामुळे स्वत:ला फिट ठेवण्यासाठी हार्दिक पांड्याने हा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पुढचे पाच सहा वर्षे हार्दिक पांड्या बंगळुरूतच राहणार आहे.
हार्दिक पांड्याने बंगळुरू शहराच्या बाहेर एक जागा भाड्याने घेतली आहे. त्यामुळे त्याला प्रशिक्षण केंद्रात जाणं येणं सोपं जाणार आहे. यामुळे त्याला सराव करण्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत. तसेच सरावाच्या वेळेचा पुरेपूर फायदा घेता येईल. यामुळे वारंवार होणाऱ्या फिटनेस चाचण्या आणि इतर बीसीसीआय प्रशिक्षण शिबिरे टाळता येतील.
32 वर्षीय हार्दिक सध्या मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्याला मुकला आहे. असं असताना झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत खेळणार की नाही हे मात्र अस्पष्ट आहे. त्याने बीसीसीआयचा ‘रिटर्न-टू-प्ले प्रोटोकॉल’ यशस्वीपणे पूर्ण केला आणि वैद्यकीय पथकाने त्याला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले. तरच हार्दिक पांड्याची निवड शक्य होईल.
