Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी याला धक्का, आंतरराष्ट्रीय पदार्पण लांबणीवर? BCCIचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं ?
IND vs IRE : 26 जूनपासून भारताचा आयर्लंड दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारत दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. मात्र, आता या दौऱ्यावर आता अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचे पदार्पण लांबणीवर पडू शकते, नक्की काय झालंयं ?

टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानचे यजमानपद भूषवत आहे. एकमेव कसोटी सामन्यानंतर, भारतीय संघ हा अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ती सीरिज संपताच लगेचच भारतीय खेळाडू UK ला जातील. तिथे भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन मॅचची टी20 सीरिज पार पडणार आहे. मात्र भारताच्या आयर्लंड दौऱ्यावर सध्या संकटाचे ढग घोंगावताना दिसत आहेत. बेलफास्टमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे भारतीय संघाच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
याबाबत ‘क्रिकेट आयर्लंड’ने एक निवेदन जारी केलं आहे. भारताचे सामने बेलफास्टवरून हलवले जातील की संपूर्ण दौराच रद्द केला जाईल, याबाबत अद्याप कोणतीही निश्चित माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआय (BCCI) आणि क्रिकेट आयर्लंड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र जर भारताचा आयर्लंड दौरा रद्द झाला, तर वैभव सूर्यवंशीचं पदार्पण पुढे ढकललं जाऊ शकतं आणि त्याला डेब्यूसाठी आणखी वाट पाहावी लागू शकते. त्याचं पदार्पण लांबणीवर पडू शकतं.
क्रिकेट आयर्लंडकडून निवेदन जारी
लिस्बर्न येथे नियोजित असलेला ‘इंटर-प्रोव्हिन्शियल टी-20 फेस्टिव्हल’ रद्द करण्यात आली आहे. ‘आयरिश सीनियर कप’ आणि ‘नॅशनल कप’ अंतर्गत रविवारी होणाऱ्या सामन्यांबाबतचा निर्णय पुढील 48 तासांत घेतला जाईल, असे ‘क्रिकेट आयर्लंड’ने गुरुवारी स्पष्ट केलं.
“सध्या अशांतता असलेल्या भागांमधील परिस्थितीवर ‘क्रिकेट आयर्लंड’ लक्ष ठेवून आहे. या रविवारी होणाऱ्या ‘आयिश सीनियर कप’ व ‘नॅशनल कप’ सामन्यांबाबत पुढील 48 तासांत निर्णय घेतला जाईल,” असं ‘क्रिकेट आयर्लंड’ने एका अधिकृत निवेदनात नमूद केलं आहे. आम्ही संबंधित अधिकारी आणि आमच्या प्रांतीय संघटनांच्या सतत संपर्कात आहोत. खेळाडू, प्रशिक्षक, सामना अधिकारी आणि चाहते यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पुढील माहिती उपलब्ध होताच ती जाहीर केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
बीसीसीआयचंही बारीक लक्ष
एका रिपोर्टनुसार, बेलफास्टमधील घटना, तेथील परिस्थितीवर बीसीसीआयचंही बारीक लक्ष आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी बेलफास्टमध्ये बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे BCCIचं टेन्शन चांगलच वाढलं आहे. बेलफास्टमध्ये नुकत्याच घडलेल्या एका चाकूच्या हल्ल्याच्या घटनेनंतर स्थलांतरितांविरुद्ध हिंसाचार उसळला. हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तणाव वाढला आणि अनेक भागांत हिंसक निदर्शने सुरू झाली. तोंडाला मुखवटे लावलेल्या निदर्शकांनी अनेक वाहने जाळली, दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठानं लक्ष्य केली आणि यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
