Gautam Gambhir : सोशल मीडिया नव्हे, ड्रेसिंग रुममधल्या त्या लोकांनाच… वर्ल्डकप जिंकताच टीकाकारांवर बरसला गंभीर
2007 चा टी20 वर्ल्डकप आणि 2011 सालच्या वनडे वर्ल्डकपमध्ये जिंकणाऱ्या संघात, गौतम गंभीर हा होता. तर प्रशिक्षक म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसी चँपियन्स ट्रॉफी 2025 जिंकली. तर काल, गंभीरच्याच प्रशिक्षणाखाली, भारतीय संघाने 2026 चा टी-20 विश्वचषक देखील जिंकलाय.

अहमदाबादच्या मोदी स्टेडियममध्ये भारतीय संघाने काल इतिहास रचला. आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. काल, 8 मार्च रोजी अहमदाबाद झालेल्या सामन्यात भारतीय संघाने किवींसमोर विजयासाठी 256 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र या टार्गेटचा पाठलाग करताना किवींचा संघ 159 धावांवरच गारद झाला.
या ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने टीकाकारांवर जोरदार हल्ला चढवला. मॅच नंतर पत्रकांराशी त्याने व कॅप्टन सूर्यकुमार यादवने संवाद साधला. त्यावेळी गंभीरने महत्वाचं विधान केलं. मी फक्त ड्रेसिंग रूममधील लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. माझी जबाबदारी फक्त संघ आणि सपोर्ट स्टाफपर्यंत आहे. सोशल मीडियावरील टीकेला उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्या टीकेचा माझ्यावर परिणाम होत नाही असं गंभीरने स्पष्ट केलं. यासोबत गंभीरने कालचा विजय आणि भारताने जिंकलेला टी-20 वर्ल्डकप हा दिग्गज खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांना समर्पित केला.
मी त्यांना बांधील नाही..
” सोशल मीडियावरच्या लोकांना उत्तर देणं माझी जबाबदार नाही, ड्रेसिंग रूममधील 30 लोकांशी मी बांधील आहे, माझ्यावर त्यांची जबाबदारी आहे ” असं गंभीरने नमूद केलं. 2007 साली भारताने पहिल्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला, त्या संघाचा गंभीर (खेळाडू म्हणून) महत्वाचा भाग होता. आता, 2026 मध्ये, प्रशिक्षक म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप जिंकत नवा इतिहास रचला.
“एक प्रशिक्षक त्याच्या संघाइतकाच चांगला असतो. खेळाडूच मला प्रशिक्षक म्हणून घडवतात” असं तो पुढे म्हणाला. दरम्यान भारताच्या कालच्या विजयात यष्टीरक्षक संजू सॅमसन (89 धावा), सलामीवीर अभिषेक शर्मा (53 धावा) आणि इशान किशन (54 धावा) यांच्या खेळीची मोलाची भर पडली.
Gautam Gambhir said, “we’ve played a lot of 160-170 cricket. I didn’t want this team to play that game, instead we wanted to play a fearless, high risk high reward game”#INDvsNZpic.twitter.com/hWQ3NjhLZc
— Khan (@ccricket713) March 9, 2026
माइलस्टोन नव्हे, ट्रॉफी असते महत्वाची
यावेळी बोलताना गंभीर म्हणाला की, भारतीय क्रिकेटमध्ये आता वैयक्तिक विक्रमांपेक्षा ट्रॉफींना प्राधान्य दिले पाहिजे. बऱ्याच काळापासून आपण टप्पे (माइलस्टोन्स) साजरे करतोय, पण माइलस्टोन्स महत्त्वाचे नसतात; ट्रॉफी महत्त्वाच्या असतात, असं त्याने नमूद केलं. मी हे विजेतेपद राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना समर्पित करतो. राहुल भाईंनी भारतीय क्रिकेटसाठी केलेल्या सर्व गोष्टींसाठी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) चे नेतृत्व ज्या पद्धतीने केले आहे त्यासाठी” असंही गंभीर म्हणाला.
यावेळी गौतम गंभीरने भारतीय संघाच्या निर्भय आणि धाडसी फलंदाजीचंही कौतुक केलं. “आपण आता पराभवाची भीती सोडून दिली पाहिजे. 120 धावांवर बाद होणे ठीक आहे. आपली ताकद धैर्य आणि शौर्यात आहे. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत 2550 धावा करणे हे त्याचा पुरावा आहे” असं गंभीरने सांगितलं.
एवढंच नव्हे तर गंभीरने कॅप्टन सूर्यकुमार यादवचंही कौतुक केलं. वैयक्तिक विक्रमांपेक्षा ट्रॉफी जिंकणे अधिक महत्त्वाचे असल्याचे पुन्हा सांगितले. “सूर्यामुळे माझे काम सोपं झाले. आता आपली जबाबदारी ट्रॉफी जिंकण्याची आहे, यश साजरे करण्याची नाही” असंही त्यांने सांगितलं.
