अखेर अतिशय ताणलेल्या आणि चिघळलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी साडेचार तास ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीचे तारणहार शरद पवार यांनी बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. मात्र, या बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आलीय. स्वतः अनिल परब यांनी पत्रकार परिषदत घेऊन ही माहिती दिली. यामुळे मुंबईतल्या आझाद मैदानावर संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी परब जर रोज तेच-तेच बोलत असतील, तर त्या बैठकीला अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
परब म्हणाले की, विलीनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाच्या समितीसमोर आहे. कोर्ट देईल तो निर्णय स्वीकारणार. शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे हाल होत आहेत. संप मिटवण्याचे प्रयत्नासाठी, संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या याबाबत चर्चा झाली. आज बऱ्यापैकी वेगवेगळ्या मार्गांची चर्चा झाली. हा संप लवकरात लवकर संपावा. त्यामुळे कर्मचारी आणि एसटीचे नुकसान होतेय. वेतनवाढीसंदर्भातही चर्चा झाली. हिवाळी अधिवेशनातही यावर चर्चा होईल. त्यानंतर बिझनेस अँडव्हायजरी कमिटीसमोर हा विषय चर्चिला जाईल, अशी माहिती परबांनी दिली.