अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस… ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे मृत्यूशी दोन दिवस झुंज देणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली. चंद्रभागा धुळाजी व्हरकटे या २९ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असताना त्या चांदवड बसस्थानकाजवळील एका उघड्या विहिरीत पडल्याचे समोर आले. तब्बल दोन दिवस अन्न-पाण्याविना अंधाऱ्या विहिरीत अडकूनही त्यांनी धीर न सोडता आपला जीव वाचवला.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे मृत्यूशी दोन दिवस झुंज देणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली. चंद्रभागा धुळाजी व्हरकटे या २९ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असताना त्या चांदवड बसस्थानकाजवळील एका उघड्या विहिरीत पडल्याचे समोर आले. तब्बल दोन दिवस अन्न-पाण्याविना अंधाऱ्या विहिरीत अडकूनही त्यांनी धीर न सोडता आपला जीव वाचवला.
चंद्रभागा आजी २९ ऑगस्ट रोजी मुलाकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. याचदरम्यान बसस्थानकाजवळील विहिरीत त्या पडल्याचे निदर्शनास आले.
विहिरीत पडल्यानंतरही चंद्रभागा आजींनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. त्यांनी विहिरीतील मोटारीच्या पाईपला आणि दोरीला घट्ट पकडून ठेवले. विहिरीत साप, किडे आणि खेकडे असूनही त्यांनी भीती न बाळगता आपली पकड कायम ठेवली. दोन दिवस उपाशी आणि तहानलेल्या अवस्थेत अंधाऱ्या विहिरीत राहूनही त्यांनी जगण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवला.
दरम्यान, स्थानिक युवक गणेश पारवे यांच्या लक्षात विहिरीतील हालचाल आली. त्यांनी तात्काळ याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक युवक, चांदवड पोलीस आणि नगरपरिषदेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आजींना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
स्थानिक युवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून बचावकार्य केले. अखेर खाटेच्या मदतीने चंद्रभागा आजींना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची सुटका होताच उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
चंद्रभागा आजींना तातडीने पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन दिवस अंधाऱ्या विहिरीत अडकूनही जिद्द आणि धैर्याच्या जोरावर जीव वाचवणाऱ्या चंद्रभागा आजींच्या या संघर्षाची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.
