दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान यांना कधीही भेटलो नाही आणि ओळखतही नाही असे स्पष्ट केले आहे. राजकीय हेतूने गेल्या सहा वर्षांपासून आपले नाव जाणूनबुजून या प्रकरणी जोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजकीय हस्तक्षेपाशिवाय निःपक्षपातीपणे पुन्हा चौकशी करण्याची मागणीही ठाकरे यांनी केली आहे.
उबाठा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान यांना कधीही भेटलेलो नाही आणि त्यांना ओळखतही नाही असे म्हटले आहे. या घटनेशी कुठलाही संबंध नसतानाही आपले नाव हेतुपुरस्सर जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दिशा सालियन प्रकरणी केलेल्या ट्विटमध्ये ठाकरे यांनी म्हटले की, गेल्या सहा वर्षांपासून राजकीय आणि वैयक्तिक हेतूने चारित्र्य हननाचा हा डाव सुरु आहे. त्यांनी अफवांचा धुरळा उडवणे थांबवण्यासाठी केवळ तथ्ये सांगत असल्याचे स्पष्ट केले.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषामुळे आणि चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोक गेल्या सहा वर्षांपासून वारंवार त्यांचे नाव या दुर्दैवी घटनेशी जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करत आहेत. कुठलाही पुरावा किंवा संबंध नसतानाही हे सुरु आहे असे ठाकरे यांनी नमूद केले. हे खोटे अभियान दुर्दैवी असून त्यात कुठलेही तथ्य किंवा सत्य नाही. अधिकृत यंत्रणांनी राजकीय हस्तक्षेपाशिवाय निःपक्षपातीपणे या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
