23 नोव्हेंबर 2019 रोजी अगदी भल्यापहाटे केलेला शपथविधी अजूनही राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यावर आज शरद पवारांनी पहिल्यांदाच मत व्यक्त करत यामागे आपला हात नसल्याचे सांगितले. या प्रतिक्रियेवर अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी त्रागा करत उत्तर देणे टाळले.
शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर साहजिकच पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी आपला त्रागा व्यक्त केला. ते म्हणाले, भाजप राष्ट्रवादी सरकार स्थापनेबाबत मला बोलायचे नाही. मला जेव्हा बोलायचे आहे त्यावेळेस बोलेन. पक्षातील जेष्ठ व्यक्ती एकदा बोलल्यावर मी त्यावर काही बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी काढता पाय घेतला. त्यापूर्वी, जोपर्यंत कोरोनाचं संकट टळत नाही, तोपर्यंत महापालिका निवडणुका घेऊ नयेत, असं एकमताने निवडणूक आयोगाला आवाहन केल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. शिवाय, महात्मा गांधींबद्दल बोलणं योग्य नाही. एकमेकांबद्दल आदर पाळला पाहिजे. आपण बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे. जर कोणी चुकीच बोललं तर त्याला कायदा आहे, अशा इशाराही त्यांनी दिला.