Amravati Violence | अमरावतीत पुढील 3 दिवस इंटरनेट सेवा बंद, अफवा रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

| Updated on: Nov 13, 2021 | 7:37 PM

अमरावती शहरात आज भाजपने बंदची हाक दिली होती. आज सकाळी राजकमल चौकात प्रचंड मोठा जमाव जमा झाला आणि त्यांनी प्रचंड तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली होती. सध्या अमरावतीत तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिल्ह्यात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Follow us on

अमरावतीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या काळात शहरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार आहे.

त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काल मुस्लिमांनी जिल्ह्यात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी जमावावर लाठीमार केला होता. त्यामुळे शहरात प्रचंड हिंसाचार झाला होता. त्यानंतर आज भाजपने बंदची हाक दिली होती. आज सकाळी राजकमल चौकात प्रचंड मोठा जमाव जमा झाला आणि त्यांनी प्रचंड तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली होती. सध्या अमरावतीत तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिल्ह्यात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

संचारबंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही तसेच, पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाहीत, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नयेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये शिक्षा पात्र अपराध केला आहे असे मानण्यात येईल. तसेच त्यानुसार कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून संपूर्ण अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे आदेशात नमूद आहे.