हनुमान चालीसा प्रकरण, दोषमुक्तीसाठी राणा दाम्पत्य न्यायालयात

| Updated on: Jan 10, 2023 | 5:05 PM

हनुमान चालीसा प्रकरणी पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

Follow us on

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविरोधात भूमिका घेतली. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरून राज्यभर हनुमान चालीसा करत धुळा उडवून दिला होता. तर तक्तालिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणू असे म्हटलं होते. त्यावरून राज्यातील राजकारण तापले होते. याचप्रकरणी राणा दाम्पत्याने आता न्यायालयात धाव घेतली आहे

हनुमान चालीसा प्रकरणी पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

यानंतर आता हनुमान चालीसा प्रकरणातील आरोपातून दोषमुक्त करण्यासाठी राणा दाम्पत्यातर्फे मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. हनुमान चालीसा प्रकरणात खार पोलिसांनी गुन्हा केला होता.

दाखल केलेल्या गुन्ह्यातून आरोप मुक्तीसाठी आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र या अर्जावर सरकारी वकिलांना उत्तर दाखल करण्याचे कोर्टाने निर्देश दिले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी 2 फेब्रुवारीला होणार आहे.