महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. भाजपाच्या मंत्र्यांच्या चिरंजीवाने हे हत्याकांड केलंय. अद्यापही त्याला अटक होत नाही, त्याला सन्मानाने बोलावलं जातं. भाजपाला शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम करायचं आहे. त्याचा निषेध म्हणून मविआच्या सर्वच पक्षांनी हा बंद पुकारला आहे. सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही. भाजपने केलेल्या या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली आहे, असंही पाटील म्हणाले.