मुंबई : सध्या राज्यात काय होणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहीलेले आहे. तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पुन्हा चार मागण्या पाठवल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमधून बंडखोर आमदारांना तसेच एकनाथ शिंदे यांना चपराक मारली आहे. तसेच बंडखोर आमदारांसह शिंदे यांना आवाहन करताना, तुम्ही फक्त सांगा, मी मुख्यमंत्री पदासह शिवसेना प्रमुख पद ही सोडण्यास तयार असल्याचे म्हटलं. त्यावर आता एएमआयएम चे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे तोंडभरून कौतूक केले आहे. ते म्हणाले आमचे राजकीय/वैचारिक मतभेद असू शकतात. मात्र मुख्यमंत्री ठाकरे हे सत्य बोलतात. त्यांच्या सत्यतेचे कौतुक करायला हवं. ठाकरेंचे हे फेसबुक लाईव्ह ऐकल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे. तुमच्या विनयशीलतेने तुमच्या पक्षातील सर्व नाराजांना जोरदार चपराक दिल्याचे त्यांनी म्हटलं आहे.