औरंगाबादः महापालिका निवडणुकांच्या (Municipal corporation) पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील (Aurangabad) पाणी प्रश्न (water issue) विविध राजकीय पक्षांकडून अधिकच जोरदार पणे उचलून धरला जात आहे. मनसेची पाणी संघर्ष यात्रा, भाजपचे 23 मे रोजी होणारे जल आक्रोश आंदोलन या दोन पक्षांनी सत्ताधारी शिवसेना आणि मनपा अधिकाऱ्यांवर दबाव वाढत आहे. त्यातच भाजपच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पाणी प्रश्नावर आंदोलन करण्यात आलं. शहरातील पुंडलिक नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागरिकांनी हंडा मोर्चा काढला. हा परिसर भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या मतदार संघात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून आमदारांनी परिसरातील पाणी प्रश्नावर काहीही उपाययोजना केल्या नाहीत, त्यामुले आज सकाळीच शेकडो महिला व पुरुषांनी रिकाम्या घागरी आणि मातीचे माठ घेऊन अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर गर्दी केली. काही कार्यकर्त्यांनी सावेंच्या कार्यालयासमोर मातीचे माठ फोडून निषेध व्यक्त केला. सकाळी 11 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला.