Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सोलापूरमधील घटनेचा निषेध करत शांततेच्या संवादाची गरज अधोरेखित केली. गणेशोत्सवादरम्यान मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत मोर्चा काढल्यास सर्वसामान्यांना त्रास होईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारीही तायवाडे यांनी दर्शवली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्यासोबत मराठा तरुणांची झटापट झाल्याच्या आरोपावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी अशा घटनांचा निषेध करत शांततेने संवाद साधण्याचे आवाहन केले. चर्चेतूनच प्रश्न सुटू शकतात, असे तायवाडे म्हणाले.
यावेळी, त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे कूच करण्याच्या निर्णयावरही भाष्य केले. गणेशोत्सवाचे दिवस असल्याने मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अशा स्थितीत आंदोलन झाल्यास सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास होऊ शकतो, अशी भीती तायवाडे यांनी व्यक्त केली. विशेषतः लाखो भाविक गणपती विसर्जनासाठी रस्त्यावर येत असल्याने त्यांच्या श्रद्धेमध्ये व्यत्यय येऊ नये आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनीही हिंदूंच्या सणात विघ्न न आणण्याचे आवाहन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका घेतल्याने, सध्या ओबीसी समाज ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे तायवाडे यांनी स्पष्ट केले. मात्र, आरक्षणाला धक्का लागल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
