रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात? भाजपचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या कारखान्यातील प्रदूषणामुळे धुकं निर्माण होऊन अजित पवारांचा विमान अपघात झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. रोहित पवारांनी हे बालिश आरोप फेटाळत, यामागे अहिल्यानगर आणि साताऱ्यातील नेते असल्याचं म्हटलंय. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी होत असून, दिल्लीतही राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
अजित पवारांच्या विमान अपघातावरून भाजपने रोहित पवारांच्या साखर कारखान्यावर गंभीर आरोप केले आहेत. पुणे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष वैभव सोलनकर यांनी दावा केला आहे की, रोहित पवारांच्या शेटफळगडे येथील साखर कारखान्यातून निघणाऱ्या प्रदूषणामुळे धुकं निर्माण झालं आणि याच धुक्यामुळे विमानाचा अपघात झाला. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
या आरोपांना रोहित पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. हे आरोप बालिश असून, यामागे अहिल्यानगर (अहमदनगर) आणि सातारा जिल्ह्यातील नेते असल्याचं त्यांनी म्हटलं. भाजपचे मोठे नेते स्वतः बोलू शकत नसल्याने चिरकूट लोकांकडून वक्तव्ये करवून घेत असल्याचा पलटवारही रोहित पवारांनी केला. दरम्यान, अपघाताच्या चौकशीसंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी प्राथमिक अहवाल आल्याचे सांगितले असून, अंतिम अहवालानंतरच बोलणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावरून राजकारण तापले असून, आगामी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
