ठाकरे सरकारमधील 11 नव्हे तर 20 मंत्र्याचे भ्रष्टाचार लवकरच बाहेर येणार असल्याचा गौप्यस्फोट करतानाच अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अनिल परबही जेलमध्ये जातील. त्यावेळी सर्वांचीच झोप उडेल, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या आज पाचपाखाडी येथील केबीपी कॉलेजमध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महिला कार्यकर्त्यांनी ठाण्यातील फेरीवाल्यांबाबत प्रश्न विचारले. त्यावर मला हे प्रश्न विचारू नका. मोठे विषय मांडा. ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकामे यावर प्रश्न विचारा, असं सोमय्या म्हणाले. ठाकरे सरकारमध्ये 11 भ्रष्टाचारी नेते आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती मला कुठून येते हे मी तुम्हाला का सांगू? मला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबतचीही माहिती मिलत असते. आता 11 ऐवजी 20 मंत्र्यांची नावे लवकरच पुढे येणार आहेत. मला अनेक ठिकाणाहून फोन येत असतात. उद्या कोण टार्गेट आहे असं विचारलं जात असतं. कोणाचा भ्रष्टाचार बाहेर येणार असं विचारण्यात येतं, असं त्यांनी सांगितलं.