नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार (Lakhimpur Violence) प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजित मिश्रा टेनी (Ajay Mishra Teni) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर अजय मिश्रा यांनी त्या पत्रकाराला शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी एका टिव्ही चॅनेलच्या पत्रकाराने जेव्हा मंत्र्यांना एसआयटी तपासाबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते भडकले आणि शिविगाळ केली.
मिश्रा यांनी टीव्हीच्या पत्रकाराला भीती दाखवण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एका पत्रकाराचा मोबाईल बंद करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळी टेनी म्हणाले की, ‘मुर्खासारखे प्रश्न विचारत जाऊ नका, डोकं बिघडलं आहे काय?’ त्यानंतर त्यांनी मोबाईल बंद केला. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय टेनीचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. यावरुन विरोधकांकडून सातत्याने अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.