Chandrashekhar Bawankule | निवडणुकीआधीच बावनकुळेंचा मोठा दावा! सर्व बंडखोर माघार घेणार; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचाच विजय?
राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध मतदारसंघांतील बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील बहुतांश अपक्ष आणि बंडखोर उमेदवार सकारात्मक चर्चेनंतर आपले अर्ज मागे घेण्याच्या तयारीत आहेत.
राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध मतदारसंघांतील बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील बहुतांश अपक्ष आणि बंडखोर उमेदवार सकारात्मक चर्चेनंतर आपले अर्ज मागे घेण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संबंधित उमेदवारांशी चर्चा केली असून त्यातून सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
विधान परिषद निवडणूक ही संख्याबळावर आधारित असल्याने ज्या ठिकाणी विजयाची शक्यता नाही, त्या ठिकाणी काँग्रेसनेही व्यावहारिक भूमिका घेत अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. “ही निवडणूक जनतेच्या थेट मतदानातून होत नाही. ज्या पक्षाकडे अधिक सदस्यसंख्या आहे, त्यांचाच विजय निश्चित असतो. त्यामुळे अनावश्यक निवडणूक टाळून बिनविरोध निवडणुकीचा मार्ग स्वीकारावा,” असे ते म्हणाले. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करत नागपूर, भंडारा, अमरावतीसह राज्यातील सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुपारी ३ वाजेपर्यंत बंडखोर उमेदवारांबाबतचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि कोणतीही मोठी बंडखोरी शिल्लक राहणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या नाराजीबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, “माझी कालच सत्तार यांच्याशी चर्चा झाली. ते पूर्णपणे समाधानी आहेत. काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात, मात्र मनभेद नाहीत.” यवतमाळमधील काँग्रेसच्या उमेदवारीवर टीका करताना त्यांनी म्हटले की, ज्या ठिकाणी मतांचे गणित स्पष्ट आहे, तिथे केवळ पराभवासाठी निवडणूक लढवण्यात अर्थ नाही. विदर्भातील पाचही जागांवर महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला.
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरांची भूमिका, उमेदवारी माघारी आणि महायुतीचे संख्याबळ यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.