पुणे : ओबीसी आरक्षणचा अध्यादेश सुप्रीम कोर्टाने फेटाळला हे अपेक्षितच होतं. गेल्या 2 वर्षांत महाविकास आघाडी एकही केस जिंकले नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून हा ओबीसी आरक्षण हाणून पाडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका करण्यात येत आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे.
सरकार फक्त गल्ला गोळा करण्यात व्यस्त
राज्य सरकारने लॉलीपॉप दिला होता. सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. इंपेरिकल डाटा गोळा करण्याची कुठलीच हालचाल न करता अध्यादेश काढला ही ओबीसी समजाची फसवणूक आहे. गेल्या 2 वर्षांत महाविकास आघाडी एकही केस जिंकली नाही, अशाही घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला आहे. हे सरकार फक्त गल्ला गोळा करण्यात ते व्यस्त आहे. ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे, असंही पाटील म्हणालेत.