NCP : मंत्रिपद जाऊन साडेचार महिने मात्र मुंडेंना बंगला सुटेना! भुजबळ ‘सातपुडा’च्या प्रतीक्षेत म्हणाले, त्यांना बाहेर कसं काढणार?
धनंजय मुंडे यांनी ४ मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नियमांनुसार, राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत शासकीय निवासस्थान रिकामे करणे बंधनकारक आहे. मुंडे यांनी मात्र या मुदतीत बंगला सोडला नाही.
मंत्री पद जाऊन साडेचार महिने लोटल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी अद्याप त्यांना देण्यात आलेला शासकीय सातपुडा हा बंगला सोडलेला नाही. यामुळे मंत्री छगन भुजबळ यांना सातपुडा बंगल्यात प्रवेश कऱण्यासाठी मोठी प्रतीक्षाच करावी लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ‘एखादं घर खाली असेल तर आपण राहिला जाऊ. पण तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय बाहेर काढणार?’, असा सवालच मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. पुढे छगन भुजबळ असेही म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी बंगला सोडला नाही पण त्यांना कसं बाहेर काढणार कारण ते आमचे सहकारी आहेत. मी अजून धनंजय मुंडे यांना या संदर्भात एक शब्दानेही बोललो नाही. मुख्यमंत्री आणि इतर मंडळी काय निर्णय घ्यायचा तो घेतील, असंही छगन भुजबळ म्हणाले. दरम्यान, अंजली दमानिया यांनी बंगला ताबडतोब घेण्याची मागणी करत साडेचार महिन्याचं भाडं वसूल करा, असेही म्हटलंय.
