मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव मुंबईमध्ये देखील होत असल्याचे समोर आले आहे. चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रात उंचच उंच लाटा उसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर मुंबईत असणाऱ्या जुहू बीचवर येणाऱ्या पर्यटक, नागरिकांना मुंबई पोलिसांनी रोखलं आहे. यावेळी समुद्रावर फिरायला येऊ नका, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे. चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्र किनारपट्टीवर जोरदार वारे वाहताना दिसताय. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार धोका लक्षात घेत समुद्र किनाऱ्यावरच लाल झेंडा लावण्यात आलाय. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका देशाला बसण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळला आहे. आता हे वादळ गुजरातच्या दिशेने वेगाने जात आहे. या चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत. IMD च्या ताज्या अपडेटनुसार, चक्रीवादळ 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळील सौराष्ट्र आणि कच्छ पार करणार आहे. त्यानंतर ते कराचीला जाणार आहे.