मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात महाराष्ट्राला साद घालत जोरदार भाषण ठोकलं. उद्धव ठाकरेंच्या जवळपास 1 तास चाललेल्या भाषणात त्यांनी भाजपवर आसूड ओढले. महाविकास आघाडी सरकार, कोरोना, भाजप, ईडी सीबीआय अशा अनेक विषयांवरुन त्यांनी शाब्दिक फटकारे लगावले. अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचं जोरदार कौतुक केलं. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी 9 वाजताच पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंनी केलेल्या टीकेची सव्याज परतफेड केली. एकेकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं पण कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी गरळ ओकली, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली.