मुंबई : महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सांगली लोकसभेची जागा परस्पंर जाहीर केल्यानंतर कॉंग्रेस नाराज झाली आहे. यावरुन कॉंग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी शिवसेनेवर आगपाखड केली आहे. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एका सांगलीच्या जागेसाठी कॉंग्रेस काय पंतप्रधान पद घालविणार का ? असा बोचरा सवाल केला आहे. यावर कॉंग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. कॉंग्रेसने कधीही खुर्चीचा विचार केला नाही. नेहमीच देशाचा सर्वप्रथम विचार केला आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि संविधानांच्या निर्मिती तसेच संरक्षणासाठी कॉंग्रेसने केलेल्या प्रयत्नांची संजय राऊत यांना देखील कल्पना असल्याचे कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. शिवसेनेने काल आपली 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करीत प्रचारात आघाडी घेतली आहे. या यादीत काल 17 उमेदवार म्हणून दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांचे नाव अचानक जाहीर केले. कॉंग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड या दक्षिण-मध्य मुंबईतून इच्छुक होत्या. तर उत्तर-पश्चिम मुंबईतून शिवसेनेने अमोल किर्तिकर यांना उतरविल्याने कॉंग्रेसचे संजय निरुपम नाराज झाले आहेत. शिवसेनेच्या सांगलीतील डबल केसरी विजेते चंद्रहार पाटील यांना चांगला पाठींबा मिळत आहे. महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ आहे. कॉंग्रेसने देश सांभाळावा असेही म्हटले आहे.