मुंबई : कोरोनानंतर यंदा दहीहंडीचा उत्साह हा काही वेगळाच आहे. विशेषत: मुंबईमध्ये तरुणाई रस्त्यावर उतरली असल्याचे चित्र आहे. तर जागोजागी राजकीय नेत्यांनीही उपस्थिती दर्शवत तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला. असे असले तरी या सर्व कार्यक्रमाला राजकीय किनार ही होतीच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागोजागी हजेरी लावत विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भयंदर येथील दहीहंडीमध्ये हे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे असल्याचे सांगत दीड महिन्यापूर्वीच राजकीय दहीहंडी फोडल्याचे त्यांनी सांगितले. तर शिवाय जनतेला मान्यही असल्याचे त्यांनी सांगितले. भयंदर येथे गीता जैन यांच्या नेतृत्वात दहीहंडी कार्यक्रम पार पडला.