2021 वर्ष संपत आले आहे. नव्या वर्षाची चाहूल लागली असून त्याच्या स्वागतासाठी तरुणाई आतूर आहे. तरुण तसेच इतर नागरिकांकडून 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातो. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी येऊन पार्टी करु नये असे आवाहान राज्य सरकारकरडून केले जात आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तसे स्पष्टपणे सांगितले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले. “ज्यांना पार्टी करायची आहे त्यांना पूर्ण वर्ष आहे. मात्र सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन कुटुंबीयांसोबत नव्या वर्षाचे स्वागत करा. पोलिसांना आम्ही काही सूचना दिल्या आहेत. जे लोक रस्त्यावर येतील त्यांच्याविरोधात कठोर करावाई करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र कारवाई करण्यापेक्षा कोरोना नियमांचे पालन करुन गर्दी करु नये, असे आवाहन मी नागरिकांना करतो,” असे वळसे पाटील म्हणाले.