येत्या 11 ऑक्टोबर रोजी होणारा महाराष्ट्र बंद हा राजकीय नसून संवेदनशीलतेसाठी आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणारा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहोत हे दाखवून देण्यासाठी आहे. तसेच लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेचा धिक्कार करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना सरकार का वाचवत आहे? कुणासाठी वाचवत आहे, असा संतप्त सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. लाखीमपूर खिरी या ठिकाणी शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं. त्याची सर्वोच्च न्यायालयाने स्यूमोटोद्वारे दखल घेतली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. जे यात मृत झाले त्यांना न्याय मिळेल. केंद्र सरकार कोणती माहिती लपवत आहे. आरोपींची नाव ओळख निष्पन्न झाली आहेत तरी त्यांना का अटक केल्या जात नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. या हिंसाचाराच्या निषेधात 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. हा बंद महाविकास आघाडी सरकारकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी काल सांगितलं होतं. तसंच अन्य मित्र पक्षांशीही बोलणं सुरु असल्याचं पाटील यांनी सांगितलं.