मुंबई : कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कसब्यात भाजपला अपयश मिळालं असलं तरी काही हरकत नाही. पुढच्या 2024 च्या निवडणुकीत भाजप जिंकून येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘कसब्यातला विजय हा महाविकास आघाडीचा विजय नाही. कारण काँग्रेसच्या उमेदवाराने साधे राहुल गांधी यांचे फोटोदेखील वापरले नव्हते. उमेदवार राहुल धंगेकर यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती होती. ती सहानुभूती आमच्या सर्व्हेतही दिसत होती. पण आम्हाला असा विश्वास होता की, हळूहळू ही सहानुभूती कमी होईल. पण ती शेवटपर्यंत राहिली. त्यामुळे त्यांना विजय मिळाला. तो कसाही मिळाला असला तरी तो विजय आहे आणि त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो’, असेही ते म्हणाले.