‘मी बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. जे विरोधक माझ्या तब्बेतीची काळजी घेत आहे, त्या काळजीवाहू विरोधकांना भगव्याचं तेज दाखवणार. विरोधकांची चिंता करण्याची गरज नाही. काळजीवाहू विरोधक हे कधीकाळी आपले मित्र होते. 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. तेच माझं मत आजही कायम आहे. राजकारण म्हणजे गजकरण आहे, असं बाळासाहेब म्हणायचे. राजकारण म्हणून आता विरोधक आता काहीही खाजवतंय. शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिशा दाखवली. हिंदुत्वासाठी सत्ता पाहिजे होती’, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं त्यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलं नाही. वापरायचं आणि टाकून द्यायचं हा भाजपचा स्वभाव आहे. हे हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलतात. सत्ता पाहिजे म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांशी युती, सत्ता हवी म्हणून मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युत्ती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मोदी हटाव या वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूंशी युती, हे आपलं हिंदुत्व नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय.