ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला असून, जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे बोलडा फाटा ते उमरा फाटा हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला असून, जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे बोलडा फाटा ते उमरा फाटा हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
कालमनुरी तालुक्यातील सोडगाव शिवारात कयाधू नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे परिसरातील शेती मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडून राबविण्यात येत आहेत.
