महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या (ncp) महिला कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यानी मारहाण केली. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीने या प्रकरणाच्या चौकशीची आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चूक असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. भाजपच्या (bjp) पदाधिकाऱ्यांची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होणारच. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणं आक्षेपार्ह बाब आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल. पोलीस दुसरी बाजू बघतील. दुसऱ्या बाजूचे लोक दोषी असतील तर कारवाई करतील, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.