अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग; जालन्यात दोन वऱ्हाड्यांमध्ये तुंबळ हाणामारी
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एका लग्नसमारंभात बूट लपवण्याच्या गमतीतून दोन वऱ्हाडींमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदी गावात घडलेल्या या प्रकारामुळे लग्नसोहळ्याचे वातावरण काही वेळातच रणांगणात बदलल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, हाणामारीदरम्यान अनेक महिलांचे दागिनेही गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एका लग्नसमारंभात बूट लपवण्याच्या गमतीतून दोन वऱ्हाडींमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदी गावात घडलेल्या या प्रकारामुळे लग्नसोहळ्याचे वातावरण काही वेळातच रणांगणात बदलल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, हाणामारीदरम्यान अनेक महिलांचे दागिनेही गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे.
लग्नसोहळा सुरळीत सुरू असताना नवरीकडील काही नातेवाईकांनी गमतीत नवरदेवाचे बूट लपवले. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून नवरदेवाच्या भावाने नवरीची चप्पल लपवली. मात्र हा प्रकार नवरीच्या काकाला सहन झाला नाही. संतापलेल्या काकाने थेट नवरदेवाच्या भावाला ठोसा मारला. यानंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि काही क्षणातच त्याचे रूप तुंबळ हाणामारीत झाले.
दरम्यान, या गोंधळात महिलांच्या गळ्यातील दागिने तुटल्याचे आणि काही दागिने हरवल्याचेही समोर आले आहे. काही जण मारामारीत सहभागी झाले होते, तर काही लोक हा प्रकार पाहण्यात व्यस्त होते. लग्नात आनंदाचे वातावरण असताना अचानक निर्माण झालेल्या या गोंधळामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
