NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; नेमकं काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. लाडकी बहीण योजनेतून एक कोटी भगिनींची नावे वगळून त्यांची फसवणूक केल्याचा दावा आव्हाडांनी केला. याव्यतिरिक्त, वाढती महागाई, बेरोजगारी, एमपीएससी पेपर फुटीतील अनास्था, एसआरए घोटाळे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत रोहित पवारांनी अनुपस्थिती दर्शवल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली यांनी महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आव्हाड यांच्या मते, सरकारने लाडकी बहीण योजनेतील जवळपास एक कोटी भगिनींची नावे वगळून त्यांची फसवणूक केली आहे, ज्यामुळे त्यांचे लाड आता पूर्ण होणार नाहीत. रक्षाबंधनाच्या दिवशीच हे प्रकरण समोर आल्याने ही बाब अधिक वाईट असल्याचे त्यांनी म्हटले. आव्हाडांनी वाढत्या महागाई आणि दुष्काळजन्य परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे नमूद केले. शेतकरी कर्जमाफीवर नाराज असून बोंबाबोंब करत असल्याचेही त्यांनी सांगितले. एमपीएससी पेपर फुटी आणि गोंधळाबद्दल सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत, बेरोजगारी वाढत असून अनेक कारखाने बंद पडत असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबईची रोजगार देणारी ओळख पुसली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मार्ट मीटर योजना आणि एसआरए घोटाळ्यांवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा गंभीर आरोप करत, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यामुळे अनेकांवर गुन्हे दाखल होत असल्याचे आव्हाडांनी स्पष्ट केले.
