नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे जवळपास सगळेच निकाल लागले आहे. 224 जागांपैकी काँग्रेसने तब्बल 135 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसने कर्नाटकात आपले निर्वावाद वर्चस्व निर्माण केलं आहे. तर भाजपला केवळ 66 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालानंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया देताना, कर्नाटकामधील जनतेचा मी आभार मानतो असे म्हटलं आहे. कर्नाटकामधील निवडणूक आम्ही लोकांच्या मुद्यावर लढलो. जनतेच्या प्रश्नाला महत्व दिले. या ठिकाणी जनतेने भांडवलशाहीचा पराभव केल्याचंही राहुल गांधी म्हणाले. तसेच मला सगळ्यात जास्त ही गोष्ट आवडली की आम्ही द्वेषाने, चुकीच्या शब्दांनी ही लढाई नाही लढली. आम्ही प्रेमाने ही लढाई लढलो. कर्नाटकच्या जनतेनं आम्हाला हे दाखवलं की प्रेम या देशाला हवंसं वाटतंय. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकानं उघडली गेली आहेत. हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. आम्ही कर्नाटकच्या गरीब जनतेला पाच आश्वासनं दिली होती. आम्ही ही आश्वासनं पहिल्या दिवशी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू असे त्यांनी म्हटलं आहे. तर जनतेने द्बेषाच्या राजकारणास नाकारलं तर प्रेमाचे स्वीकारलं, असा टोला मोदी यांचे नाव न घेता त्यांनी लगावला आहे.