Farmer Protest | शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात
कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नांवरून राज्यातील आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी, खासदार विनायक राऊत आणि महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आज गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगला असा मोर्चा काढण्यात आला. मात्र, आंदोलनादरम्यान पोलिसांनी प्रमुख नेत्यांसह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नांवरून राज्यातील आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी, खासदार विनायक राऊत आणि महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आज गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगला असा मोर्चा काढण्यात आला. मात्र, आंदोलनादरम्यान पोलिसांनी प्रमुख नेत्यांसह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांकडून यापूर्वीच शेतकरी नेते राजू शेट्टी तसेच आंबा बागायतदार उत्पादक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही आंदोलकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्याबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, मोर्चा वर्षा बंगल्याजवळ पोहोचल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी कारवाई करत राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी महादेव जानकर यांना पोलिसांनी उचलून नेत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांच्या मागण्यांवरून राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
