अवकाळी पावसाचा गहू, हरभरा,ज्वारी पिकांना फटका! शेतकऱ्याचे मोठे नुकसान
लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी पिके आणि फळबागांचे, विशेषतः आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा करत आहेत.
लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांना फटका बसला आहे. ग्रामीण लातूरमधील अनेक भागांत, विशेषतः रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशमुख गावामध्ये, पिके पूर्णपणे आडवी पडली आहेत. यामुळे ज्वारी काळीभोर पडून तिला बाजारात भाव मिळत नाहीये.
फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आंब्याला आलेला मोहोर गळून पडला असून, लागलेले आंबेही गळून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. निसर्ग आणि सरकार या दोन्हीकडून शेतकरी अडचणीत सापडल्याची भावना व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
Published on: Feb 24, 2026 11:39 AM