tv9 Marathi Special Report | जरांगेंनंतर हाकेंचा मुंबईकडे एल्गार! 1 सप्टेंबरला आझाद मैदानात ओबीसींचा महासंग्राम; सरकारसमोर नवं आव्हान काय?

tv9 Marathi Special Report | जरांगेंनंतर हाकेंचा मुंबईकडे एल्गार! 1 सप्टेंबरला आझाद मैदानात ओबीसींचा महासंग्राम; सरकारसमोर नवं आव्हान काय?

| Updated on: Aug 31, 2026 | 8:27 AM

ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेसाठी लक्ष्मण हाकेंनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन जाहीर केले आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षणाला धोका पोहोचत असल्याचा हाकेंचा आरोप आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी हाके आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईत मोठे आंदोलन पुकारले आहे. आझाद मैदानावर हे आंदोलन करण्याची हाकेंनी घोषणा केली असून, जरांगे पाटलांमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असल्याचा त्यांचा मुख्य आरोप आहे. या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक वातावरणात नवा पेच निर्माण झाला आहे.

लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावरून या आंदोलनाची सुरुवात होईल. या ठिकाणाहून हजारो वाहनांसह ओबीसी समाज बांधव मुंबईकडे रवाना होणार आहेत. मुंबईत आझाद मैदानावर हे आंदोलन करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या मोर्चाला अधिकृत परवानगी दिलेली नाही. तरीही, “परवानगी नसली तरी आंदोलन आझाद मैदानातच होईल,” या भूमिकेवर हाके ठाम आहेत, ज्यामुळे प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.

हाकेंनी ओबीसी समाजाला उद्देशून बोलताना म्हटले आहे की, “कुणी कितीही सांगितलं, काहीही बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला, ओबीसींनो अजिबात संभ्रमित व्हायचं नाही. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला 1 सप्टेंबरला दौंडच्या पाटस टोलनाक्यावरनं लाखोंच्या संख्येने मुंबईकडे निघायचं आहे.” त्यांनी मनोज जरांगे पाटलांवरही जोरदार टीका केली. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनांना परवानगी मिळते, मात्र ओबीसींना मोर्चा काढायचा म्हटल्यावर बंदी घातली जाते, हा दुजाभाव सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “मुख्यमंत्री महोदय, आमच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतील आपले उपोषण सुरू ठेवले आहे. त्यांच्या मागणीनुसार जर सरकारने निर्णय घेतला नाही किंवा आंदोलन यशस्वी झाले नाही, तर तेही मुंबईला येण्याचा इशारा देत आहेत. त्यामुळे एकाच वेळी मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाचे नेते मुंबईत आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

या आंदोलनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी मोर्चाला परळीतील एका नेत्याने 50 लाख रुपये दिले आहेत. “या मोर्चामागे जातीय दंगल घडवण्याचा हेतू आहे. ओबीसी समाजातील कोणताही कार्यकर्ता हाकेंबरोबर नाही, हा केवळ त्यांच्या स्वार्थासाठी काढलेला मोर्चा आहे,” असे डोंगरे म्हणाले.

तर, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवरच निशाणा साधला आहे. “राज्य सरकारच लक्ष्मण हाके आणि जरांगेंमध्ये भांडण लावत आहे. ही सगळी नुराकुस्ती सुरू आहे,” असे पटोलेंनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात सत्तेसाठी सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाचाही त्यांनी उल्लेख केला.

एकूणच, एकीकडे अंतरवालीत जरांगे पाटलांचे उपोषण तर दुसरीकडे मुंबईत आझाद मैदानात हाकेंचे नियोजित आंदोलन, यामुळे दोन्ही समाजांच्या मागण्या ऐकून त्यातून सर्वमान्य तोडगा काढण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे.

Published on: Aug 31, 2026 8:27 AM
Follow Us