जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील कळमनामध्ये पेपर मिल लाकूड आगाराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली. आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केले. ही आग इतकी भीषण आहे की, संध्याकाळपासून अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. अग्निशमन दलाच्या 40 बंबानी 350 हून अधिक फेऱ्या करूनही आग सुरूच आहे. या आगीमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, 20 एकरावर पसरलेला लाकूड डेपो जळून खक झाला आहे. या घटनेत आतापर्यंत तब्बल 50 कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दरम्यान आग पसरल्याने डेपो शेजारी असलेल्या पेट्रोल पंपला देखील आग लागली. मात्र पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल नसल्याने हा पंप गेल्या तीन दिवसांपासून बंद होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.