स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20 व्या ऊस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शेट्टींनी टीका केलीय. इतकंच नाही तर महाविकास आघाडीसोबत गेल्याचा पश्चाताप होत असल्याचं मोठं वक्तव्यंही शेट्टी यांनी ऊस परिषदेत केलंय. शेट्टींच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता मला पश्चाताप होतोय, असंही शेट्टी यावेळी म्हणाले. ऊस उत्पादक शेतकरी लांब गेले तर राष्ट्रवादीचं काय होईल याचा विचार करा. महाविकास आघाडीनं घरगुती वीज ग्राहकांना फसवलं, पूरग्रस्त, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवलं. सरकारमध्ये राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं का, याचा निर्णय लवकरच घेऊ. आता कुणाला भेटायला जायची गरज नाही, असा इशाराच शेट्टी यांनी पवारांना दिलाय.